सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत   

पर्यायी व्यवस्थेकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष

राजगुरुनगर, (वार्ताहर) : लादवड (ता. खेड) गावाजवळ पुलाच्या संथ कामामुळे नव्याने बनवण्यात आलेल्या तात्पुरत्या सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी साठले. त्यामुळे पश्चिम भागातील शिरोली ते पाईट रस्ता बंद झाला आहे. परिणामी सुमारे २० गावांकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने पिंपरी बुद्रुक गावातून वळवली आहे.
 
मागील जवळपास सात महिन्यांपासून पाईट-आंबोली जिल्हा मार्ग क्र. १६ वर लादवड गावाजवळ नवीन पुलाचे काम सुरू आहे. हे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अत्यंत संथगतीने सुरू असून गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने हा सेवा रस्ता पाण्याखाली गेला आहे. काही ठिकाणी हा रस्ता खचून त्यावर मोठ्या प्रमाणावर तळ्याप्रमाणे पाणी साठले आहे. त्यामुळे लादवड गावाकडे जाणारी वाहतूक पिंपरी बुद्रुक गावातून वळवण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपासून बांधकाम विभागाचे अधिकारीदेखील पावसामुळे अडचण होईल, असे ठेकेदाराला अनेकदा सांगूनदेखील ठेकेदार त्यांना दाद देत नसल्याचे समजते.
 
या रस्त्याबाबत ठेकेदाराकडून वेळकाढूपणा सुरू असून, जोरदार पाऊस झाल्यास रस्त्याची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र, याकडेही ठेकेदाराने दुर्लक्ष केले. त्यामुळे पाईट-आंबोली रस्त्यावरील २० गावांच्या ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे. याबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.
 

Related Articles